आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

मुंबई – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मंत्रीमंडळ सदस्यांसमवेत संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारपणामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार की नाही, यावर बरीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकावर टीका केली. यंदाही कमी कालावधीचे अधिवेशन घेणे, चर्चा टाळणे आणि लोकशाही कुलुपबंद करण्याची परंपरा याही वेळी राज्य सरकारने सुरू ठेवल्याचे फडणवीस म्हणाले.अनेक राज्यांची अधिवेशनं सुरू आहेत पण राज्यात सरकारची मानसिकताच नाही, सरकारने लोकशाही बंद करून सरकारची रोकशाही आणि रोखशाही असाच कारभार सुरू आहे. विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी एकेक वर्ष विरोधकांना सभागृहातून निलंबित करणारे हे सरकार असल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.