…तर मग पंजाबमध्ये भाजपाला विजय का मिळवता आला नाही? नाना पटोले यांचा थेट सवाल 

मुंबई – पाच राज्यातील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही आत्मचिंतन करु आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकशाहीमध्ये जनतेचा कौल महत्वाचा असतो. जनतेने जो कौल दिला त्याचा आम्ही स्विकार करतो. आम्ही पाचही राज्यात मोठ्या ताकदीने लढलो. या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जनतेसमोर गेलो होतो परंतु ते बाजूला पडले. निवडणुकीत हार जीत होतच असते, अटबिहारी वाजपेयी, इंदिराजी गांधी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पण या पभराभवाने खचून न जता जनतेचे मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा ताकदीने २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जावू. भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याचे काम करत आहे, देश विकून देश चालवला जात आहे.

उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणुका लढवल्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसचे ७ आमदार होते. यावेळी ४०३ जागांवर उमेदवार उभे केले होते. आम्हाला अपेक्षित निकाल लागला नसला तरी मतांची टक्केवारी वाढली आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे नेतृत्व कणखर आहे. आमच्या पक्षाचे नेतृत्व कोणी करावे हे काँग्रेसचे कार्यकर्ते ठरवतील आणि नेतृत्वावरच बोलायचे तर मग पंजाबमध्ये भाजपाला विजय का मिळवता आला नाही, असे पटोले म्हणाले.