‘ज्या नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले, त्यांनाच उद्धव ठाकरे वाचवत आहेत’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे चांगलेच चर्चेत आहेत. मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या अटकेला जवळपास महिना पूर्ण होत असून भाजपाने यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली असताना राष्ट्रवादीने मात्र त्यासाठी नकार दिला असून सध्या त्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. यादरम्यान भाजपा आमदार श्वेता महाले यांनी गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेचं (shivsena) हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना काँग्रेस (Congress) बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली, असं  विधान भाजपच्या आमदार श्वेता महाले (shweta mahale) यांनी केलं आहे.

टीव्ही9 मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या,हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे. त्यामुळेच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको, असंही त्या म्हणाल्या. ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व निघून गेलं आहे. सध्या शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे, अशी टीका त्यांनी केली.