टोमॅटोची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॉलीत बसलेल्या ३ महिलांचा जागेवरच मृत्यू

दौंड – दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ट्रॉलीत बसलेल्या ३ महिलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे .तर ५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हि घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रावणगाव मध्ये ट्रॅक्टरमधून शेतातील टोमॅटोची वाहतूक सुरु होती. टोमॅटोचे ७५ ते ८० क्रेट यामध्ये होते. टोमॅटो घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून बाहेर पडताना खडकवासला कालव्याच्या ३२ व्या क्रमांकाच्या वितरीकेवरून निघाला होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या ९ महिला या ट्रॉलीखाली सापडल्या.

रावणगाव परिसरातील या महिला होत्या. उपचारादरम्यान यातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली .या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे सुरेखा पानसरे,रेश्मा पानसरे व अश्विनी आटोळे या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.महिलांवर दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.