प्रेमकथेच्या ‘आठवणी’ पत्रातून उलगडणार! दोन पिढ्यांच्या प्रेमाचा टीजर आउट

बदलत्या काळानुसार संवादाची माध्यमे बदलत जातात, मात्र प्रेम तसेच राहते. दोन पिढ्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकथेची गोष्ट पत्रावाटे उलगडून दाखवणारा सिद्धांत सावंत लिखित-दिग्दर्शित ‘आठवणी’ ह्या सिनेमाचा टीजर नुकताच आपल्या भेटीला आला आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्यासह प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरक, निनाद सावंत हे तीन आश्वासक चेहरे दिसत आहेत. प्रेमाच्या विषयाला एका वेगळ्या भावनिकतेने साद घालायला दिग्दर्शक यशस्वी झाल्याचे दिसून येते आहे.

मराठीत आजकाल कौटुंबिक सिनेमे येत नाहीत असे म्हणणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा सिनेमा मूड चेंजर ठरणार आहे. प्रेमातील भावनांचे केलेले तरल चित्रण ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. उत्तमोत्तम फ्रेम आणि आजचा काळ आणि जुना काळ प्रभावीपणे मांडण्याचे काम सिनेमॅटोग्राफर ध्रुव देसाई ह्यांनी उत्तमपणे केल्याचे दिसून येते. तसेच उत्तम कविता, समर्पक संगीत आदी गोष्टींनी संपन्न असा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला उत्सुक असलेल्या प्रेक्षकांची संख्या वाढते आहे .

ज्येष्ठ रंगकर्मी आणि तरुण अभिनेते ह्यांचा उत्कृष्ठ मिलाफ असलेली दोन पिढ्यांची ही गोष्ट आहे. मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट येत्या ७ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.