आमदारांपाठोपाठ आता 8 ते 9 खासदारही नाराज; शिवसेनेच्या अडचणी आणखी वाढणार

Mumbai – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग घिरट्या घालत आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने ४८ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतहून गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमध्ये (Guwahati) शिवसेनेचे ४१ आमदार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राजकीय संकटाच्या काळात भाजप पुढील रणनीतीवर वेगाने काम करत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात नव्या समीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करत गेलेल्या आमदारांप्रमाणेच आता शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 8-9 खासदारही (MP) उद्धव यांची साथ सोडू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. यापैकी बहुतांश खासदार कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavna Gavali) यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय आज आणखी काही नावे समोर येऊ शकतात. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाण्याचे लोकसभेचे खासदार राजन विचारे आणि नागपूरचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हेही पक्षावर नाराज आहेत.

एका आमदाराच्या निधनामुळे महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या सध्या २८७ आहे. अशा स्थितीत बहुमतासाठी 144 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला (MVA) राज्यातील १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर विरोधकांकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यात भाजपचे 106, आरएसपीचे 1, जेएसएसचे 1 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या ३७ समर्थक आमदारांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ठाकरे सरकार अल्पमतात येईल. मात्र, एकनाथ शिंदे भाजपसोबत जातात की स्वबळावर गटबाजी करून वर्चस्व कायम ठेवतात , हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.