चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे  – जयंत पाटील

जळगाव   – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या, क्रियाशील कार्यकर्ते आपल्या भागात तयार करा, आपापसातील वाद बंद करा आणि आपली संघटना मजबूत करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. तेव्हा या महाराष्ट्रात पवारसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे ही गोष्ट जाणवली होती. एक मोठा विचार आपल्याकडे आहे. या आधारावर आपल्याला ही संघटना फार व्यापक करता येईल. यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

बुथ कमिट्या पूर्ण करा, संघटना सक्षम करा, सदस्यता नोंदणी पूर्ण करा. आपल्या पक्षाची वाढ कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे आदेश देतानाच जळगाव जिल्ह्यातील आपल्या अनेक उमेदवारांची थेट लढत ही शिवसेनेशी होती. शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. पक्षांतर केलेले लोकांना कधीही आवडत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या आमदारांप्रती मोठा राग आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल सत्ताधाऱ्याच्या विरोधात गेल्यास काही महिन्यातच निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण संघटनात्मक बांधणी करत राहिले पाहिजे. आपले घड्याळ घराघरात पोहोचले पाहिजे असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

गुरुवारी राज्याचे अधिवेशन संपले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त होते. सरकार लक्ष देत नव्हते आम्ही सभागृहात संघर्ष केला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यास भाग पाडले. त्यामुळे आता तुम्हीही जोमाने संघर्ष करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.  जळगाव येथे ज्या सूचना आल्या त्या सुचनांचा नक्कीच विचार केला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.