माझ्यामागे कितीही चौकश्या लावा, राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणारच –  एकनाथ खडसे

जळगाव –  एकनाथ खडसेंच्या मागे सर्व यंत्रणा लावल्या आहेत. मिळेल ती चौकशी करत आहे, प्रचंड छळवणूक केली जात आहे. तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार असे ठणकावून सांगतानाच हे सगळे बदनाम करण्याचे कारस्थान आहे. आम्ही याला भीक घालत नाही असा स्पष्ट इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला.

परिवार संवाद यात्रेत बोलताना ते म्हणाले,  या भागात आमदार निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला हवे, संघटनेचा पाया मजबूत करायला हवा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता हस्तगत करायला हवी तेव्हा आपल्याला लोकहिताचे काम करून आपले आमदार निवडून आणू शकतो असे स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी मांडले.

एक काळ होता काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांंना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार करा असेही एकनाथ खडसे म्हणाले.

या जिल्ह्यात राष्ट्रवादी एकटी आहे. आपल्या विरोधात सर्व विरोधक आहेत पण आपण पुरून उरणार असल्याचे स्पष्ट करतानाच शरद पवार आजतागायत लढत आहेत. अहंमपणा विसरून जर आपण काम केले तर निश्चित लोकं तुमच्या मागे उभा राहणार आहेत असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जयंत पाटील हे ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. पदाधिकारी जर असा कर्तव्यदक्ष राहिला तर नक्कीच आपली संघटना एका विशेष टप्प्यावर येईल अशा शब्दात जयंत पाटील यांचे विशेष कौतुक एकनाथ खडसे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा व पक्षाच्या अडचणी सांगितल्या.

यावेळी आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, रोहिणीताई खडसे, संतोष चौधरी, मनिष जैन, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, दिलीप सोनवणे, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक वंजारी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.