अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतून भाजप उमेदवार मागे घेणार? फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

मुंबई| महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची (Andheri East Bypoll Election) चर्चा आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून (BJP) या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान,मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदाराने देखील CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची आज मुंबईत एक महत्वाची बैठक होत आहे. भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोहोचले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri Bypoll) संदर्भात बैठक होत असल्याची माहिती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आव्हान भाजपला केले आहे. त्यामुळे आता उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल ही बैठकीसाठी पोहोचले आहेत.