‘शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख, तीन जिल्ह्यात सुद्धा त्यांना कोणी ओळखत नव्हतं’

बारसू – बारसू रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा सध्या चर्चेत असून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. यातच ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील कोकणात गेले असून बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख असून त्यांना तीन जिल्ह्यात देखील कोणी ओळखत नव्हतं असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पावरून थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच टीकास्त्र सोडले आहे. याच वेळेला बारसू येथील प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या असं आवाहन करत बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही असा थेट इशारा दिला आहे.

प्रकल्पाची माहिती हिम्मत असेल तर इथे येऊन द्या तो प्रकल्प ग्रामस्थांना समजावून सांगा आणि ग्रामस्थांनी होकार दिला तरच हा प्रकल्प करा असं आवाहन देखील सत्ताधाऱ्यांना केलं आहे. यासोबतच पोलिसांना बाजूला ठेवून येऊन दाखवा म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंज दिला आहे.