राजस्थानातील विवाहित महिला प्रेमाखातर पोहोचली पाकिस्तानात ! पती आणि मुलांना सोडून घरातून पळाली

जयपूर – प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची कहाणी (The story of Seema Haider) आता सगळ्यांनाच कळली आहे. सीमा हैदरनंतर अशा अनेक बातम्या समोर आल्या ज्यात परदेशी महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आपल्या मुलांसह भारतात आल्या आहेत. मात्र यावेळी राजस्थानमध्ये जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे.

राजस्थानमधील भिवडी येथे राहणारी अंजू आपल्या प्रियकराच्या निमित्तानं पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात पोहोचली आहे. जयपूरला जाते बोलून घरातून निघून गेलेली अंजू आता कुटुंबाला सोडून लाहोरमध्ये असल्याचे पती अरविंदला गेल्या रविवारी समजले. पोलिसांनी पतीपर्यंत पोहोचून चौकशी केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

अरविंद कुमार (अंजूचा नवरा) यांनी सांगितले की, घर सोडण्यापूर्वी अंजूने त्याला सांगितले होते की ती जयपूरमध्ये एका मैत्रिणीला भेटायला जात आहे. पण, रविवारी रात्री तिने फोन करून आपण लाहोरमध्ये असल्याचे सांगितले. अरविंद म्हणतो की अंजू लाहोरला का गेली आणि तिला व्हिसा कसा मिळाला हे माहित नाही. अंजूकडे सर्व कागदपत्रे असल्यामुळे सीमा हैदरसारखे हे प्रकरण नाही, असे अरविंदचे मत आहे. पीडितेचा पती अरविंद सांगतो की, पत्नी अंजूने त्याला सांगितले होते की, ती दोन-तीन दिवसांत घरी परतणार आहे. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.

अरविंद म्हणतो की, आई परत आली तरी आईसोबत राहायचं की नाही हे आता त्यांची मुलं ठरवतील. ही महिला घरच्यांना न सांगता कुठेतरी गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. अंजूने आपली फसवणूक केल्याचे अरविंदचे म्हणणे आहे आणि तो आता तिच्या आई-वडिलांना बोलावून एकत्र बसून पुढील निर्णय घेईल.

या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अंजू पाकिस्तानातील कोणाशी तरी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर २-३ वर्षांपासून बोलत होती. तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितले की ती एका मित्राला भेटायला जात आहे, परंतु 21 जुलै रोजी पाकिस्तानात पोहोचली. भिवडीचे एसएसपी सुजित शंकर सांगतात की, पोलिसांकडे अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार आलेली नाही.