ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी क्राईम ब्रँच व EOW ला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत : अतुल लोंढे

नागपूर – ड्रग्जच्या काळ्या धंद्यात भाजपाचे नेते, भाजपाशी संबंधित लोक यांचे मोठे रॅकेट आहे. देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचा गोरखधंदा सुरू असून त्याच्याशी संबंध असलेल्या मनिष भानुशाली, के. पी. गोसावी, रविंद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट करत यामागील मास्टर माईंड कोण आहे हे जनतेसमोर यावे यासाठी या सर्वांना अटक करावी आणि EOW आणि क्राईम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

ड्रग्जचा काळा धंदा व भाजपाचे संबंध याची पोलखोल करताना अतुल लोंढे म्हणाले की, गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर देशातील सर्वात मोठा ड्रग साठा ३००० किलो ज्याची किंमत २१ हजार कोटी रुपये आहे, हा पकडला गेला. देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचे एक मोठे षडयंत्र असून यात भाजपाचे नेते, भाजपाशी संबंधित लोक यांचा सहभाग आहे. मुंद्रा पोर्टवरील या कारवाईवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मुंबईत एमसीबीच्या मार्फत क्रूझवर रेड टाकून काही ग्रॅम ड्रग पकडून हे प्रकरण तापवत ठेवले गेले जेणेकरुन मुंद्रा प्रकरणाची चर्चाच होऊ नये. अदानी मुंद्रा पोर्टवरील ड्रग्ज व मुंबईतील एनसीबीची रेड यात काही समान धागेदोरे आहेत. के.पी. गोवासी, मनिष भानुशाली व एनसीबीचे समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी संबंध येत आहे. समीर वानखेडेसोबत सुनील पाटील, सुनिल पाटीलसोबत मनिष भानुशाली आणि मनिष भानुशालीसोबत के. पी. गोसावी हे एक वर्तुळ आहे. तर निरज यादव हा मध्य प्रदेशचा भाजपाचा कार्यकर्ता आहे. हे सर्वजण या रॅकेटचा हिस्सा आहेत.

२१ सप्टेंबरला मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज पकडले गेले त्यानंतर २२ सप्टेंबरला के. पी. गोसावी व भानुशाली गुजरातमध्ये पोहचले व गुजरातचे मंत्री किरिटसिंह राणा यांना भेटले.. लल्लन टॉप या वेब पोर्टलाला मुलाखत देता देता मुझे कुछ काम था …मुंद्रा….म्हणत तो थांबतो…आणि मनिष भानुशाली ३ ऑक्टोबरला एक व्हिडिओ टाकून ‘काम हो गया’ असे म्हणतो… ‘काम हो गया’ हा संदेश त्याने कोणाला दिला व कोणते काम झाले याचा उलगडा झाला पाहिजे. आणि एक मुद्दा असा की मुंद्रा पोर्ट ड्रग, एनसीबीची मुंबईतील रेड व ५० लाख रुपयांची देवाण घेवाण झाली (खंडणी) अशी डिसुझाने माहिती दिली. या सर्व प्रकरणात एक इनोव्हा कार वापरण्यात आली, त्या इनोव्हा कारचा नंबर MH 12, JG 3000 असून ही इनोव्हा कार रविंद्र कदम यांच्या नावावर आहे. यासाठी जो पत्ता दिलेला आहे तो कराडचा आहे. कारच्या मालकाचे नाव रविंद्र कदम, पत्ता- ८१५, माणिक चौक, उंब्रज, तालुका कराड, जि. सातारा असा नोंदलेला आहे. पण आम्ही माहिती घेतली असता या पत्त्यावर रविंद्र कदम नावाचा कोणी व्यक्ती रहात नाही हे उघड झाले आहे. हा रविंद्र कदम कोण? ज्या रविंद्र कदमची कार आहे तो यातील मास्टर माईंड आहे की गुर्गा?, की त्याचा वापर केला हे स्पष्ट झाले पाहिजे. ही गाडी त्या ठिकाणी कशी गेली याची माहिती घ्यायची असले तर रविंद्र कदमला पकडून चौकशी केली तर अदानी मुंद्रा पोर्ट, एनसीबीची रेड, ५० लाखांची खंडणी वसुली व त्यात कोण कोण सहभागी आहे या रॅकेटचा छडा लागू शकतो. या सगळ्या ड्रग्सच्या लिंकमध्ये सॅम डिसोझा, मनीष भानूशाली, किरण गोसावी, फ्लेचर पटेलपर्यंत यांचे फोटो किरीटसिंग राणांसोबत दिसतात, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतात. असे सर्व उघडपणे दिसत असताना नवाब मलिकांनी जर आरोप केला तर तो खोटा कसा म्हणायचा?

देशातील सर्वात मोठा ड्रग साठा मुंद्रा पोर्टवर आला आणि तो कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुंबईत छोट्या कारवाई करुन हिंदू मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सर्व लक्ष मुंद्रा पोर्टवरील ड्रग वरून मुंबईतील प्रकरणावर वळवण्याचा प्रयत्न झालेला आहे. गौतम अदानीच्या मुंद्रा पोर्टवर पकडण्यात आलेले देशातील सर्वात मोठ्या प्रमाणातील ३००० किलो ड्रग्ज ही देशातली नव्हे तर जगातील सर्वात मोठी कारवाई आहे. पण त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यात आले. (DRI) Director of Revenue intelligence हे आयात निर्यातीच्या मालाची चौकशी करत असते, तो अर्थमंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग आहे. या DRI कडून मुंद्रा पोर्टवरील ड्रग प्रकरणाची चौकशी काढून NIA कडे वर्ग करण्यात आली. NIA हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारित काम करते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत जे गौतम अदानी हा माझा मित्र आहे असे म्हणतात. यातूनच सर्व स्पष्ट होते. गौतम अदानी यांनी केंद्र सरकार जसे नोटिफिकेशन काढले तसेच नोटिफिकेशन काढत अफगाणिस्तान, इराणमधून येणारे कंटेनर मंद्रा पोर्टवर येणार नाहीत असे म्हणतात, ते कोण आहेत, ते फक्त पोर्टचे हँडलर आहेत. हा अधिकार सरकारचा असतो, कोणा एका व्यापाऱ्याचा नाही. अदानी काय देशापेक्षा, संसदेपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.पत्रकार परिषदेत लोंढे यांनी या प्रकरणाशी निगडीत सर्व पुरावे सादर केले.