पवारसाहेबांनी नव्हे तर केसरकरांनी बंडखोरी करून शिवसेना व महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला – राष्ट्रवादी

मुंबई   – शरद पवारसाहेबांवर शिवसेना संपवण्याचा आरोप करणारे दिपक केसरकर तुम्हीच बंडखोरी करून शिवसेना व महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना संपवण्यामागे संजय राऊतांच्या मागून शरद पवारसाहेब यांचा हात आहे असा आरोप केला आहे. याला जोरदार प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिले आहे.

दिपक केसरकर तुम्ही राष्ट्रवादीत होता त्यावेळी सन्मानाने जबाबदारी देण्यात आली होती. आणि पवारसाहेबांना हे करण्याची गरज नाही. त्यांच्यासमोर राज्य आणि देशातील अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यामागे व्यस्त आहेत असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

तुमचे बंडखोर आमदार सुरतमार्गे गुवाहटीला नेलात आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केलात.आता मनसेसोबत घरोबा करण्याचा विचार सध्या तुमचा सुरू आहे. त्यामुळे बंडखोर सेना आमदार मनसेचे आमदार होणार की भाजपसोबत जाणार याची उत्सुकता जनतेला लागून राहिली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांना आज ईडीने समन्स बजावले आहेत. महाराष्ट्रात मोदी सरकारविरोधात आवाज उठवला त्या सर्वांच्या मागे ईडी लावण्याचं काम कुणी केलं याचंही उत्तरही दिपक केसरकर द्यावं असे आवाहनही महेश तपासे यांनी केले आहे.