मी संयमाची भूमिका घेतली अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते – पडळकर

Goipchand Padalkar – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याचा दावा केला जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आज इंदापूर दौऱ्यावर होते. ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर व त्यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मात्र, सभा संपल्यानंतर आमदार पडळकर हे इंदापुरातील एका आंदोलन स्थळाला भेट देण्यासाठी गेले असता  शेजारीच मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठीचे साखळी उपोषण सुरू होते. याच दरम्यान पडळकर तिथे आल्यावरून मराठा बांधवांकडून पडळकर यांना जाब विचारण्यात आला. त्याच दरम्यान मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि हे सुरु असताना त्यांच्या दिशेनं चप्पल फेकण्यात आली, अशी माहिती आहे.

या सर्व प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका मांडत चप्पलफेक करणाऱ्यांचा आक्रमक शब्दांत समाचार घेतला आहे. मी काल जर समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

इंदापुरात घडलेल्या घटनेबद्दल बोलताना गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “ओबीसी समाज अत्यंत संयमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडत आहे. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. घटनेनंतर या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते. मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे,” असा घणाघाती आरोप पडळकर यांनी केला आहे.

धनगर समाजाला केलं आवाहन
चप्पलफेकीच्या घटनेवर भाष्य करत असताना गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “मराठा आंदोलनामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki