संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला – फडणवीस

औरंगाबाद – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पुन्हा एकदा पाणी प्रश्न (Water Crisis) पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत ‘जल आक्रोश मोर्चा’ काढला जातोय. औरंगाबादमधील सामान्य नागरिक देखील या मोर्चात  सहभागी झाले असून महिलांचा सहभाग देखील लक्षणीय आहे.

भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले आहेत. हंडा हातात घेऊन महिला कार्यकर्त्या शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), डॉ. भागवत कराड यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला, त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.