भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? – जयंत पाटील

रायगड  – मविआचे ( MVA ) निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची ( Income tax ) धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केला आहे.आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली.

धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी पवारसाहेबांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. पवारसाहेब नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले असेही जयंत पाटील म्हणाले.

आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दुध का दुध पानी का पानी होणारच पण यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली. फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो. जातीयवादी पक्षांना राष्ट्रवादीच उत्तर देऊ शकते हे लोकांना आता पटले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

मावळ लोकसभा निवडणुकीत उरणमधून राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली मते मिळाली. मोदी लाट असताना, पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवत असताना पक्षाने एक चांगला रिझल्ट दिला त्याबाबत प्रत्येक कार्यकर्त्याचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले. Everyday is Chance to get better त्यामुळे निराश व्हायचं नाही, संघर्ष असतोच मात्र त्या संघर्षानंतर विजय आपलास असतो. म्हणून खचून जावू नका असा धीरही जयंत पाटील यांनी दिला.

२०१९ साली विधानसभा निवडणुकीचा काळ होता, सर्व नेते सोडून जात होते. पक्ष काही टिकणार नाही, १०-१५ आमदार निवडून येतील असे भाकित केले गेले मात्र आपले नेते पवारसाहेब बाहेर पडले आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून आणले हेही जयंत पाटील यांनी सांगितले.

चांद्यापासून बांद्यापर्यंत पवारसाहेबांना मानणारे लोक महाराष्ट्रात आहेत त्याच लोकांनी साहेबांवर विश्वास टाकला आणि राज्यात परिवर्तन झाले हेही आवर्जून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. अदिती तटकरे पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहे, आपण तिला साथ द्या. इथे बुथ कार्यकर्ते घडवा, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवा जेणेकरून तो माणूस कायमस्वरूपी राष्ट्रवादीशी जोडला जाईल. प्रशांत पाटील अतिशय चांगले काम करत आहे, मला खात्री आहे ते अधिक मेहनत घेऊन या भागात राष्ट्रवादीचा झेंडा रोवेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

उरण विधानसभा मतदारसंघाचा आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज रायगडात आली आहे. आम्ही या दौऱ्याची वाट पाहत होतो. सुरुवात रायगडातून झाली नसेल पण आम्ही सांगता दिमाखदार करू असे आश्वासन रायगडच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.

रायगड जिल्हा पवारसाहेबांच्या आवडीचा जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. चांगली आरोग्य सुविधा, चांगल्या नागरी सुविधा पुरवण्याचे काम आम्ही करत आहोत. मच्छीमार बांधवांसाठी उपक्रम राबवले जात आहे. याच कामाच्या जोरावर पक्ष संघटना बळकट करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील राहू असा शब्द अदिती तटकरे यांनी दिला.

आदरणीय पवारसाहेबांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या भागाचा नेहमीच विचार केला आहे. दि.बा. पाटील साहेबांनी एक मोठा लढा भूमिपुत्रांसाठी दिला आणि इथल्या भूमीपुत्रांना न्याय देण्याचे काम पवारसाहेबांनी केले. त्यामुळे येत्या काळातही भूमीपुत्रांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनिल तटकरे यांनी दिले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्ण करुन ही यात्रा आता रायगड येथे पोहोचली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून संघटनेला एक उर्जा मिळेल असा विश्वासही खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.