‘ED कडे ५५ लाख रु. भरले तेंव्हाच उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना जाब विचारायला हवा होता’

मुंबई – शिवसेना खा. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईवर न थांबता अंमलबजावणी संचालनालयाने गोरेगाव ( Goregaon ) येथील पत्रा चाळ घोटाळ्यात खा.राऊत यांच्या सहभागाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या ( Dr. Kirit Somaiya ) यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके ( Ganesh Hake ) , अतुल शाह ( Atul Shah ) या प्रसंगी उपस्थित होते.

डॉ.सोमय्या यांनी सांगितले की, खा.राऊत यांनी ८ महिन्यांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरून आपल्या गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. आपल्यावर कारवाई होणार या भीतीने हबकलेल्या खा.राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर आरोप करणे सुरु केले होते. माझ्या कुटुंबियांना तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. राज्यसभा अध्यक्षांना पत्र पाठवून अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र या दबावाला न जुमानता अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.

खा. राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे ५५ लाख रु. भरले तेंव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांना जाब विचारायला हवा होता. मात्र तसे न करता ठाकरे सरकारने पोलिसांवर माझ्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला. माझ्याविरुद्ध चौकशीसाठी कितीही एसआयटी नेमा, मी घाबरत नाही, असेही डॉ. सोमय्या यांनी नमूद केले.