सरकार अतिशय बेजबाबदार, राज्यात वाढतायेत अत्याचार – यशोमती ठाकूर

अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री (CM)आणि उपमुख्यमंत्री अतिशय बेजबाबदारपणे वागत असून राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही. यामुळे राज्यातील महिला व मुलांवर अत्याचार वाढत आहेत. या वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे सरकार (Shinde Government) जबाबदार असून महाराष्ट्राला बेवारस करून दोघांची दिल्लीवारी सुरू असल्याचा जोरदार टोला काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिंदे-फडणवीस यांना लगावला आहे.

भंडारा, पुणे यासह राज्यात ठिकठिकाणी महिला व मुलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांच्या पार्श्वभूमीवर ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, बहुमत असल्याचा कांगावा करीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांचं सरकार बनवून महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे काम केलं आहे. राज्याचा कारभार सचिवांच्या हाती सोपवून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दोघेही मान्यवर दिल्लीत असल्याचे ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.