‘हर हर महादेव’ चित्रपटावरून ठाण्यात राडा, जितेंद्र आव्हाडांनी बंद पाडला शो; प्रेक्षकालाही मारहाण

ठाणे: ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचे आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. अशातच काल छत्रपती शिवाजी महाराज यांचे वीर मावळे बाजीप्रभू देशपांडे यांची यशोगाथा सांगणाऱ्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विरोध दर्शवला आहे. आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा चालू शो बंद पाडला.

अभिजित देशपांडे (Abhijit Deshpande) दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. या चित्रपटात शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. याच कारणावरून काल ठाणे येथील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ‘हर हर महादे’व चित्रपटाचे स्क्रिनिंग होत असलेल्या या चित्रपटगृहात आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आणि त्यांनी चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबवले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहातील सर्व लोकांना बाहेर काढले. उपस्थित प्रेक्षकांपैकी काहींनी त्यांना विरोधही दर्शवला. यादरम्यान विरोध दर्शवणाऱ्या एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केल्याची दृश्ये पुढे आली आहेत.

मात्र राष्ट्रवादीने राडा घातल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी ५ मिनिटात विवियाना मॉल गाठून चित्रपट पुन्हा सुरू करण्यास सांगितले. यानंतर अविनाश यांनी स्वत: चित्रपटगृहात संपूर्ण चित्रपट पाहिला.