साधूंना मारहाण : आज मविआ सरकार असते, तर हिंदुत्ववाद्यांनी…; हेमंत देसाई यांचे टीकास्त्र

मुंबई – सांगलीत (Sangli) चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत (Jath) तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी तसेच चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी चारही साधूंना मारहाण केली.

दरम्यान, या घटनेवरून जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सरकारला झोडपले आहे. जत तालुक्यात साधूंना मारहाण होण्याची घटना घडली. आज महाविकास आघाडी सरकार असते, तर हिंदुत्ववाद्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर अमेरिकेपर्यंत ऐकू जाईल, एवढा शंखनाद केला असता… आज मात्र मीडियावाले आणि ‘हिंदुत्वासाठी शिर तळहाती धरू’ म्हणणारे बऱ्यापैकी शांत आहेत. कारण, यातली बरीचशी मंडळी फक्त संधिसाधूच आहेत! अशी खोचक टीका देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केली आहे.