…तर आदित्य ठाकरेंना गोमूत्राने अंघोळच घालावी लागेल – म्हात्रे

मुंबई :- स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार..? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल युवराजाना या पापातून मुक्त करण्यासाठी गोमूत्राने अंघोळच घालावी लागेल असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे.

आज स्वर्गीय शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांच्या समधीस्थळाचे दर्शन घेतले होते. मात्र यानंतर काही वेळात येऊन शिल्लक सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडून ते समधीस्थळाचे शुद्धीकरण करण्याचा बालिशपणा केला.

मात्र आयुष्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर याना आपले स्फूर्तीस्थान मानणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणारे काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना अद्दल घडवण्यासाठी जोडे मारो आंदोलन करणाऱ्या बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनी ज्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत जाऊन मिठी मारली, त्याच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाहीर अपमान केला आहे. त्यामुळे या पापातून मुक्त होण्यासाठी नक्की आपलं शुद्धीकरण आदित्य ठाकरे नक्की कसं करून घेणार..? असा बोचरा सवाल शीतल म्हात्रे यांनी शिल्लक सेनेच्या कार्यकर्त्यांना विचारला आहे.