हिंदूंनी 4-4 मुलं जन्माला घालावीत, दोन VHP-RSS ला द्यावी; साध्वी ऋतंभरा यांचे वादग्रस्त वक्तव्य

कानपूर:  हिंदू लोकांनो, तुम्ही चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील दोन मुलं ही देशासाठी द्या असं आवाहन साध्वी ऋतंबरा (Sadhvi Rithambara) यांनी केलं आहे. भारत लवकरच हिंदू राष्ट्र बनेल असंही त्या म्हणाल्या. दिल्लीतील जहांगिरीपूरीमधील धार्मिक दंगलीवरुन त्या कानपूरमध्ये बोलत होत्या.

रविवारी निराला नगर येथे राम महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, ज्या लोकांनी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक केली त्या लोकांना देशाचा विकास झालेलं बघवत नाही. जे लोक राजकारणाचा वापर करुन हिंदू समाजाची विभागणी करायचा प्रयत्न करत आहेत त्यांना मातीत मिळवलं जाईल. भारत हे लवकरच हिंदू राष्ट्र होणार आहे.

“तुम्ही तर दोन मुलं जन्माला घातली आहेत. हम दो, हमारे दो.. पण माझी विनंती आहे की हिंदू समाजाच्या बांधवांनो, दोन नाही, चार मुलांना जन्माला घाला. त्यातली दोन मुलं देशासाठी समर्पित करा. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. ते बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील. ते विश्वहिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्ते बनतील”, असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, यावेळी साध्वी ऋतंभरा यांनी हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी जाती-पातींमधून बाहेर येण्याचं आवाहन देखील केलं. “हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जाती-पातींमधून बाहेर या. राष्ट्रीय स्वाभिमान असायला हवा. कोणताही राजकीय पक्ष जातींचं गाजर दाखवून आपल्याला भुलवू शकत नाही. माझा देश आणि माझ्या देशाचं भलं सर्वतोपरी असायला हवं. हिंदू जातीचा हाच मंत्र असायला हवा”, असं त्या म्हणाल्या.