नवाब मलिक यांना बाहेर आणण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहणार; शरद पवार यांचा निर्धार 

पुणे  – नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना यातना देण्याचा प्रयत्न जाणुनबुजुन केला जातोय मात्र याविरोधात संघर्ष करणार असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मांडली. दरम्यान नवाब मलिक यांना मंत्रीमंडळातून काढा असा आग्रह भाजप करतेय परंतु त्यांना अटक झाली म्हणून का काढा ?असा उलट सवाल शरद पवार यांनी भाजपला केला आहे.

गेली २० वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असे चित्र दिसले नाही मात्र आताच दिसले. एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचं. कारण नसताना हा आरोप केला जातोय असेही शरद पवार म्हणाले.

मला याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक यापध्दतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्याची चिंता करण्याचे कारण नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावता याचा अर्थ हे सगळं राजकीय हेतूने केलं जातंय असेही शरद पवार म्हणाले.

नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रीमंडळातून काढा असं बोलताय. कबूल आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. उद्या कदाचित त्याचा खुलासा करतील असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.