जो व्यक्ती स्वत:च्या पक्षातील आमदारांना न्याय देऊ शकत नाही तो काँग्रेसला कसा देणार ?

अमरावती – आज शरद पवारच ( Sharad Pawar ) मुख्यमंत्री हवे होते. ती काळाची गरज आहे. शरद पवार यांनी आत्तापर्यंत चारवेळा मुख्यमंत्रीपद भुषवलं आहे. मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर जर शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र काहीसं वेगळं असतं असं वक्तव्य यशोमती ठाकूर ( Yashomati Thakur ) यांनी केलं आहे.

अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठातील शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आणि सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी बनवण्या त्यांचा प्रमुख आत असला तरी आजच्या तारखेत ते मुख्यमंत्री असायला होते. ती आज काळाची गरज आहे असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनीही यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ”माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर कोणतीही शंका नाही. मला तर वाटतं की त्यांनी UPA चं नेतृत्व करावं. तसा प्रस्ताव तुम्ही द्याल का यशोमतीताई? असा खोचक प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी विचारला आहे.

दरम्यान, या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली असून आता सारवासारव करत ठाकूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांच मार्गदर्शन नेहमीच लाभत असतं. २०१९ च्या निवडणूकीच्या वेळची आठवण मी सांगत होते. भावनिक कार्यक्रम होता. आज महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एकीने काम करत आहे. उद्धवजींच्या नेतृत्वात ५ वर्षच नाही त्यापुढे ही महाविकास आघाडी काम करेल. माझ्या विधानाचा विपर्यास करु नये, इगो करु नये असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye)  यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मंत्री यशोमती ठाकूर ताई, तुमची खंत आम्ही समजू शकतो. काँग्रेस सत्तेत असूनही कुणी विचारत नाही. शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिलेत त्यातच त्यांनी धन्य मानलं. तुम्ही बोलला, शरद पवार मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते. सर्वप्रथम आपण हे जाहीरपणे बोलून दाखवलं त्यासाठी तुमचे आभार, नाहीतर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं बिरूद मिरवणाऱ्या शिवसेनेला त्यांच्या महाविकास आघाडीतील आमदार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पाहू शकत नाही हे समोर आले. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसैनिकांना त्याग करायला लावणं. स्वत:चे आमदार, खासदार जाहीरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीविरुद्ध नाराजी व्यक्त करत असताना त्यांना गप्प बसायला लावणं. निधी मिळत नसलेल्या स्वपक्षीय आमदारांना मौन बाळगायला सांगणे. हे पाहता जो व्यक्ती स्वत:च्या पक्षातील आमदारांना न्याय देऊ शकत नाही तो काँग्रेसला कसं देणार त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली असावी. असं ते म्हणाले.