पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक झाली ;मात्र पवारसाहेब असल्या गोष्टींना पुरून उरतील – जयंत पाटील

रायगड – विरोधक ऐनकेन प्रयत्न करून महाविकास आघाडी सरकार पाडू पाहत आहे मात्र त्यांना ते शक्य होत नाही. सरकार पडत नाही म्हणून आता इतर माध्यमातून त्रास दिला जात आहे. पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक केली गेली. मात्र पवारसाहेब असल्या गोष्टींना पुरून उरतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने कर्जत विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी काल घेतला. मागील सरकार भाजप – सेनेचे नव्हते तर ते फक्त भाजपचे सरकार होते म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी खुणगाठ बांधली आणि भाजपची साथ सोडली असे सांगतानाच आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. आज राष्ट्रवादीचे आमदार सरकारबाबत अजितदादा असतील मी असेन आमच्याकडे तक्रार करतात मात्र जाहीर कधीच बोलत नाही. याचा अर्थ असा की महाविकास आघाडी मजबूत आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आज महागाई तोंड आ वासून उभी आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहे, रोज दर वाढवले जात आहे. त्यावर भाजप काहीच बोलायला तयार नाही. पंतप्रधान महोदयांनी यातून हात काढून घेतला आहे. आपल्याला हेच जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे, त्यासाठी आपल्याला कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करायची आहे आणि म्हणून पक्ष संघटनेवर भर द्यायचा आहे असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

पालकमंत्री अदिती तटकरे या चांगलं काम करत आहेत. सरकारच्या माध्यमातून इथे विविध विकास कामे आपण करू. लोकांच्या समस्या सोडवून पक्षाला ताकद देण्याचे काम केले जाईल. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपण ताकदीने लढा असे आदेशही जयंत पाटील यांनी दिले.