मी कधीही मुख्यमंत्री व्हावं, म्हणून हे काम केलं नाही – एकनाथ शिंदे

मुंबई – आम्ही चुकीचं काम केलं नाही. ज्या पक्षासोबत निवडणूक लढवली, त्यांच्यासोबतच आम्ही युती केली आहे. 2019 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात बाळासाहेब आणि मोदी यांचे फोटो लावून आम्ही मतदारांसमोर गेलो. जनतेचा देखील हाच कौल होता की, शिवसेना-भाजप युतीच सरकार आलं पाहिजे. मात्र समीकरण बदललं, दुसरं सरकार आलं. ते आम्ही दुरुस्त केलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

शिंदे यांनी म्हटलं, मतदारांनी युतीला कौल दिला होता. आता हे झाल्यानंतर मला खूप लोकांनी फोन करत अभिनंदन केलं. अनेक लोकांनी मला म्हटलं, की आम्ही युतीला मतदान केलं होतं. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे असे नवीन प्रयोग करताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. आमची मतं घेऊन आमच्याशी विश्वासघात झाला होता. त्यामुळे आज आम्ही खूप खूश आहोत, असं मला अनेक लोकांनी म्हटलं.

पुढे बोलताना मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त मेहनत करत राहिलो. मी कधीही मुख्यमंत्री व्हावं, म्हणून हे काम केलं नाही,असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे.