कॉग्रेसशी आघाडी शिवसेना करू शकते, तर MIM शी आघाडी का करणार नाही – मनसे 

मुंबई  – गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांच्या सरकारवर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात असताना सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय. एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सुमित खांबेकर यांनी एक लक्षवेधी ट्वीट करून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, स्व.बाळासाहेबांची संपूर्ण विचारसरणी बाजूला सारून कॉग्रेस शी आघाडी शिवसेना करू शकते, तर MIM शी आघाडी करणार नाही ह्याबाबत शंकाच आहे,हिंदुत्वाला ज्यांनी तिरांजली दिली,ते सत्तेसाठी काहीही करू शकतात हे महाराष्ट्राला अडीचवर्षा पूर्वीच कळलं आहे. असं खांबेकर म्हणाले आहेत.

MIM ने युतीसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉग्रेस कडे प्रस्ताव दिला आहे(आघाडी),ह्यावरून असा बोध घ्यावा की हिंदुत्व सोडल्यानंतर प्रस्ताव देण्या इतपत मन जवळ आले आहेत…! असं म्हणत त्यांनी आणखी एक टोला शिवसेनेला लगावला आहे.