महाविकास आघाडीला डिस्टर्ब करण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न राहिला नाही; जयंत पाटलांचे खणखणीत प्रत्युत्तर 

मुंबई – महाविकास आघाडीला (MVA) डिस्टर्ब करण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न राहिला नाही किंवा एकला चलो ही भूमिका राहिलेली नाही. तिन्ही पक्ष एकत्र रहावेत हीच आहे. त्यामुळे प्रफुल पटेल (Praful Patel) हे परदेशी असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कोणत्या परिस्थितीत निर्णय झाला हे पाहिल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी व्यक्त केले.

नाना पटोले (Nana Patole) यांचा आरोप चुकीचा आहे. राज्यात येणार्‍या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local body elections) होणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र बसवून महाविकास आघाडी एकत्र रहावी असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे वेगळं काम झालं असेल तर त्याची नोंद पक्ष घेईल असेही जयंत पाटील म्हणाले.

स्थानिक नेत्यांचे कुणाशी पटतं तर कुणाशी पटत नाही किंवा टोकाची मतमतांतरे कुणाची झाली आहेत याचादेखील दुसर्‍या बाजूने विचार करून घेण्याची आवश्यकता आहे. त्याची माहिती घेऊ. नाना पटोले यांनी संपर्क साधला होता मात्र स्थानिकदृष्टया मनं दुभंगलेली असल्यामुळे अडचणी निर्माण होत असाव्यात कदाचित याबाबतीत तपशीलात जाऊ असेही जयंत पाटील यांनी सांगितले.