हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम अखेर रद्द; आमदार रवी राणा यांची घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आज दिवसभर नवनीत राणा यांच्या खारमधील इमारतीबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दोन्ही बाजूने एकमेकांना आव्हानं दिली जात असताना आता राणा दाम्पत्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

आम्ही आमचे आंदोलन संपवत असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेने सुरु असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. दरम्यान, या घोषणेनंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला असून राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.