‘आज बाळासाहेब असते तर अशी टगेगिरी करण्याची कोणाची हिंमत झाली असती?’

मुंबई : महाविकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात तीन पक्षांचं सरकार आलं असलं तरी अनेकदा त्यांच्यातील वाद उघडपणे समोर येत असतात. भाजपाकडूनही वारंवार तीन चाकांची रिक्षा असा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात असते. तिन्ही पक्षांचे नेतेही अनेकदा एकमेकांविरोधात वक्तव्यं करत आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडत असतात. त्यातच आता शिवसेनेचे २५ आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेचे २५ आमदार हे निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना निधीवाटपात मतभेद होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या काही आमदारांनी जाहीरपणे पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यावर या आमदारांची समजूत काढण्याची जबाबादारी उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे.

यावरून आता भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. ‘राष्ट्रवादीच्या ‘दादा’गिरी’ला कंटाळून शिवसेनेचे 25 आमदार बजेटवर बहिष्कार टाकणार असल्याचे समजले. वाईट वाटले. काय अवस्था झालीये शिवसेनेची? मा. बाळासाहेब असते तर अशी टगेगिरी करण्याची कोणाची हिंमत झाली असती? मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने सगळे गमावत आहात. भोगा आपल्या कर्माची फळं! लालच बहुत बुरी बला होती है साहब!!’ असा घणाघात श्वेता महाले यांनी केला आहे.