मुंबईची आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटरवर’; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

मुंबई – भांडुप येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा सेफ्टीक शॉकने (Septic Shock- Infection)मृत्यू झाला असून एक बालक अत्यवस्थ असल्याच्या घटनेप्रकरणी भारतीय जनता पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. एनआयसीयूमध्ये जीवघेणे इन्फेक्शन होतेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत पेंग्विन बाळाच्या बारशात मशगुल सत्ताधाऱ्यांना बालमृत्यूने शोकाकुल असणाऱ्या मुंबईकरांचे सोयरसुतक नसून पालिकेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा सेफ्टीक शॉकनेच मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयातील एनआयसीयु (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खाजगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी आणि जागृती पाटील यांनी वारंवार तक्रार करून आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने व रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरवर्षी साडेचार हजार कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यानंतरही मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू असतील तर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कोणी विश्वास ठेवण्यास धजावेल का ? असा सवाल गटनेते श्री. शिंदे यांनी उपस्थित केला.

तरी याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन खाजगी संस्थेकडून काढून घेऊन सदर खासगी संस्थेचा वैद्यकीय परवाना आणि नोंदणी रद्द करावी तसेच या नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित रुग्णालय प्रशासन डॉक्टर आणि खाजगी संस्थाचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.