नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्र

सांगली – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल 20 सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने सुरू आहे असं मत मांडलं.

ते म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरने दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला अहवाल सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी म्हटलंय की अंदाधुंद पद्धतीने तुम्ही सरकारी मालमत्ता विकत आहात. हे देशाच्या हिताचं नाही. माझ्या भाषेत सांगायचं झालं, तर दारुड्याला जर दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, तर तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले, तरी त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे. हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो. रिझर्व्ह बँकेने त्याला आता पुष्टी दिली आहे.

देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली होती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं सांगितलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे. असं म्हणत कॉंग्रेसवर देखील प्रहार केला आहे.