“महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार”, जयंत पाटील यांचा दावा

Mumbai- गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला मुख्यमंत्री बनायला आवडेल, असे विधान दिले होते. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणज अजित पवारांचे बॅनरही लावण्यात आले होते. अजित पवारांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकावण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्रीवरुन सुरू असलेल्या या रस्सीखेचीदरम्यान आता जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचे आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केले आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.