राज्यावर पुन्हा लॉकडाऊनचे संकट, आज जाहीर होणार नवी नियमावली

मुंबई : राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

काल दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या.

दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असल्यानं कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, असा सल्ला केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आढावा घेतला.