बाबासाहेबांच्या जयंतीदिनी ५ हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांना ताक वाटप

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनविलेल्या मिसळ व ताकाचे मोफत वाटप

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी (Ambedkar Jayanti) पुण्यात ५ हजार किलो मिसळ (Misal Pav) व १ लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने एकूण तब्बल १० हजार किलो मिसळ वाटप करण्यात आले.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ व ताक तयार केले. शुक्रवारी पहाटे ३ पासून मिसळ व ताक करण्याकरिता तयारी सुरु झाली. पालक मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि पुण्यातील सर्व राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व प्रमुखांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता भव्य अशा कढई मध्ये सर्व पदार्थ व मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर एका कढईत संपूर्ण मिसळ व दुसऱ्या भव्य कढईत ताक तयार झाले. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ व १ लाख बंधू-भगिनींना ताक वाटप करण्यात आले.

उपक्रमामध्ये ५ हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो, हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरा कीस ७० किलो, तमाल पत्र ५ किलो, फरसाण १२०० किलो, पाणी ४००० लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच ताक बनवण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात दही, मीठ, कोथिंबीर सह इतर साहित्य वापरण्यात आले.