उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही; पडळकरांनी विरोधकांना धुतलं

मुंबई – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मंत्री आणि गोव्यात सरकार स्थापन करण्याच्या शिवसेनेचा दावा आता किती हास्यास्पद होता हे देखील समोर आले आहे. सोशल मिडीयावर आता सेनेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. सेनेप्रमानेच राष्ट्रवादीची देखील अवस्था असून खासदार शरद पवार यांना देखील ट्रोल केले जाऊ लागले आहे. यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून विरोधकांना टोला लगावला आहे.

पडळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून गावगाड्यातील लोकांना केंद्रस्थानी मानून काम केले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2014 मध्येच सुरु झाले. राष्ट्रीयत्वाच्या मुद्यावर मोदींनी प्रखर भूमिका घेतली आहे. देशातील नागरिकांना हे मान्य आहे. आपला कोंबडा आरवल्याशिवाय दिवस उगवत नाही, असे काही कोंबड्यांना वाटते. असेच लोक एकत्र येऊन पंतप्रधानांच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत.

राष्ट्रहित कशात आहे, विकास कशाममुळे होतो यावर नागरिकांची मते ठरलेली आहेत. त्यामुळे भाजपच बाजी मारणार आहे. विरोधकांनी जे अंदाज व्यक्त केले होते, ते अंदाज फेल गेले आहेत. उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही. असे कितीही लोक एकत्र आले तरी फरक पडणार नाही. हे पुन्हा एकदा या निकालातून स्पष्ट झाले आहे, असेही पडळकर म्हणाले.