साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला, पवारांची देशाला गरज : प्रफुल्ल पटेल

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा (Sharad Pawar Resigning) केली आहे. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.

गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे.

यावेळी कार्यकर्ते पवारांना राजीनामा देवू नका असा आग्रह धरत असताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले की, पवार साहेबांच्या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय ज्वलंत झाल्या आहेत. तुम्ही जसे स्तब्ध झाला, तसेच आम्हीदेखील आहोत. साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. तुमच्यासारखीच भावना आमचीही आहे. तुमच्या वतीने आम्हीही साहेबांना हात जोडून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

पवार साहेब आता लगेच काही बोलायला तयार नाहीत. पण, मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी या निर्णयाबाबत फेरविचार करावा. त्यांनी आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर करावा. त्यांची पक्षाला या राज्याला आणि देशाला गरज आहे. साहेब कायम आपले साहेबच आहेत. त्यांच्या विचाराशी आपण तुलना करू शकत नाही. पण, त्यांनी आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा. अशी मी महाराष्ट्र आणि देशातील जनतेच्यावतीने त्यांना विनंती करतो.असं ते म्हणाले.