कामापेक्षा दिखाऊपणा व चमकोगिरीवरच अधिक भर देण्याचा लाजीरवाणा प्रकार भाजपने बंद करावा – राष्ट्रवादी 

पुणे : कामापेक्षा दिखाऊपणा व चमकोगिरीवरच अधिक भर देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपुरुषांची पुतळे- स्मारके यांवर संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावण्याचा जो लाजीरवाणा प्रकार सुरू केला आहे, तो त्वरित बंद करावा. पुणेकर(Punekar)  व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा प्रकार कदापि खपवून घेणार नाही. असं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP’s city president Prashant Jagtap) यांनी म्हटले आहे.  सिंहगड रस्त्यावरील (sinhgad road)  ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर लावण्यात आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाच्या नामफलकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत हे नामफलक हटविले गेले नाही, तर  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटविण्याचे काम करतील. तसेच, महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर संकल्पना ही संकल्पनाच हद्दपार केली जाईल. तसा शब्दच आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांना देणार आहोत.असं  जगताप यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले,  पुणे महानगरपालिकेत सत्तेत असताना मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाला कोणतीही ठोस कामगिरी करता आली नाही. पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी, नवीन आस्थापनांची उभारणी अशा सर्वच आघाड्यांवर भाजपला अपयश आले आहे. कामापेक्षा दिखाऊपणा आणि चमकोगिरीवरच भर देण्याच्या भाजपच्या या प्रवृत्तीचा झालेला पर्दाफाश पुणेकरांनी पाहिला आहे. अलीकडे तर राष्ट्रपुरुषांची पुतळे – स्मारके यांपेक्षाही स्वत:चे कर्तृत्व मोठे असल्याचे भाजपकडून दाखवून दिले जात आहे. संकल्पनाच्या नावाखाली स्वत:चा डंका वाजवून घेण्याचा प्रकार घडत आहे. अलीकडेच ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यावर संकल्पनाच्या नावाखाली भाजपच्या एका माजी नगरसेविकेच्या सासूचे नामफलक लावण्यात आले होते. महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा नामफलक खाली उतरवला. परंतु, भाजपने त्यातून काही धडा घेतलेले दिसत नाही.

सिंहगड रस्त्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ या शिल्पावर भाजपच्या एका माजी नगरसेवकाने संकल्पनाच्या नावाखाली नामफलक लावले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिका आयुक्त मा. विक्रम कुमारजी यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. आठ दिवसांत हे नामफलक हटविण्यात आले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ते हटवतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. या महानगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, तेव्हा ही संकल्पनेची संकल्पनाच आम्ही हद्दपार करणार आहोत.

आपण कोण, आपण काय संकल्पना राबवली आहे, याचा विचारच भाजपचे माजी नगरसेवक करताना दिसत नाहीत. मुळात ज्या कर्तृत्वाचा मान राखण्यासाठी महापुरुष, राष्ट्रपुरुषांची स्मारके, पुतळे उभारण्यात आली आहेत, त्या राष्ट्रपुरुष, स्वातंत्र्यसैनिक, स्वराज्यातील मावळे यांच्यापुढे आपली पात्रता काय, आपण संकल्पनाच्या नावाखाली काय दर्शवू पाहात आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. स्वराज्याची राजधानी रायगडाची निर्मिती करणारे स्वराज्याचे बांधकामप्रमुख हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या निर्मितीच्या बदल्यात रायगडावर फक्त एक पायरी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला जातील, तेव्हा त्यांच्या पायाची धूळ कायम आपल्या नावावर पडावी, एवढीच इंदुलकरांची इच्छा होती. रायगडाची निर्मिती करणाऱ्या इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी जागा हवी होती, तर भाजपचे हे माननीय मावळ्यांच्या, छत्रपतींच्या सरदारांच्या डोक्यावर स्वत:च्या नावाचा डंका वाजवत आहेत. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांबाबत भाजपला काय आदर आहे, याचे प्रदर्शन या ‘माननीयां’नी घडवून आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रकार कदापि सहन करणार नाही, हे भाजपने व माजी नगरसेवकांनी लक्षात घ्यावे.असं देखील ते म्हणाले.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, संतोष नागरे, विपुल म्हैसुरकर, किशोर कांबळे, संतोष पिसाळ, समीर पवार, प्रदीप शिवचरण, हेमंत गायवाड, विक्रम जाधव, शिवम इभाड, अभिजीत बारवकर, दिनेश खराडे, वैशाली थोपटे, श्वेता होनराव, सारिका पारेख, अनिता पवार, भावना पाटील, शिल्पा भोसले, शालिनी जगताप, भक्ती कुंभार, ललिता मोरे, शालन उभे, मोनाली गोडसे, स्वाती जाधव, भक्ती कुंभार, तृप्ती पोकळे, मनीषा होते, उर्मिला गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.