देवेंद्रजी… मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना?

मुंबई – अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात बंडखोरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आमदार-खासदारांशी संपर्क होत आहे. शिवाय आपले दावे कसे खरे हे सांगण्यासाठी वारंवार पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत.

दरम्यान, भाजपची ही खेळी पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याला रुचली नसून सदर पदाधिकाऱ्याने भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली आहे. पुणे ग्रामीण भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना पत्राद्वारे पाच प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे पुणे जिल्ह्यात मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढे दिवस ज्यांच्याविरोधात काम केले आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

कालचा शपथविधीने भाजपची की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार? मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना? आम्हा निष्ठवंतांची काही सोय केलीये का? असे पत्राद्वारे पाच प्रश्न पारखी यांनी फडणवीसांना विचारले आहेत. साहेब जमलं तर जरूर उत्तर द्या, अशी सादही त्यांनी घातली आहे. आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता काय करायचे, असा प्रश्नही नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना विचारला आहे.महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.