‘जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत,महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही’

मुंबई – “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! तुम्ही मुघलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान केले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत, असे बेताल वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, याबाबत आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आव्हाडांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील, असं ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.