शरद पवार कधी शिवाजी महाराजांचे नावही घ्यायचे नाहीत; भाषणं काढून बघा त्यांची – राज ठाकरे

सिंधुदुर्ग: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेत छत्रपती शिवाजी महाराजांवरून (Shivaji Maharaj) राजकारण करणाऱ्यांना चांगलेच झापले आहे. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचे नावही घेत नव्हते, सत्ता गेल्यावर अचानक नाव घ्यायला सुरुवात केली, अशा शब्दांत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.

शरद पवार कधीही छ. शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेत नसत. त्यांची भाषणं काढून बघा. सत्ता गेल्यावर ते अचानक शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लागले. व्यासपीठावरही फक्त शाहू-फुले-आंबेडकरांच्या प्रतिमा. पण ज्यांच्या प्रेरणेवर शाहू-फुले-आंबेडकर विचार आहे त्या आमच्या शिवछत्रपतींची प्रतिमाही कुठे नसायची, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

जातीपातीच्या पलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं. काही जण राजकीय स्वार्थासाठी इतिहास वापरत आहेत. राष्ट्रवादीच्या जन्मापासून, साल १९९९ पासून महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरु झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचं, असंही राज ठाकरे बोलले.