शिंदे-फडणवीस सरकारला पराभव दिसत असल्यानेच निवडणूका घेत नाही :- नाना पटोले

मुंबई- महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत होत असताना विरोधकांनी पुन्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मविआला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाला भिती बसली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गट व भाजपाचा धुव्वा उडाला व शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. मागील तीन वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची तिसरी विशाल सभा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते ते पुढे म्हणाले की, शेतकरी, मध्यमवर्ग महिला, तरुण हे सर्वजण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहेत. राज्यात अनेक महानगरपालिकांची मुदत संपून दोन दोन वर्ष झाली पण प्रशासक बसवले आहेत. महानगरपालिका जनतेसाठी आहेत पण तिथे निवडणूक घेत नाही. सर्व कारभार प्रशासनाच्या हाती सोपवला आहे. सरकार पराभवाला घाबरत आहे म्हणून निवडणूका घेत नाही.

खारघर मध्ये सरकारने हत्याकांड घडवले पण अजून एकही गुन्हा नोंद केलेला नाही आणि कसलीही कारवाई झालेली नाही. तर बारसूमध्ये जनतेवर अत्याचार करत आहेत. बारसूचा रिफायनरी प्रकल्प हा कोकणच्या विकासासाठी नाही तर सरकारच्या बगलबच्च्यांच्या विकासासाठी आहे हे उघड झालेले आहे. आज जर सरकारने निवडणुका लावल्या तर त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनीही भाजपा शिंदे सरकारवर (Shinde-Fadnavis Government) सडकून टीका केली. मविआ एकत्र राहून निवडणुका लढल्या तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होतो हे मागील काही निवडणुकांवरून दिसले आहे. विधान परिषद, अंधेरी, कसबा पोटनिवडणुकीत व बाजार समिती निवडणूका जिंकून मविआने हॅटट्रिक केला आहे . आता मुंबईसह इतर महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा लोकसभा निवडणुका जिंकून आपल्याला षटकार मारायचा आहे. जनता आसाराम गयारामांना स्थान देत नाही.

भाजपाला मंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे ती मुंबईकरांच्या विकासासाठी नाही तर त्यांचा डोळा हा मुंबई महापालिकेतील ९२ हजार कोटींच्या ठेवींवर आहे.

भाजपा सतत डबल इंजिन सरकार म्हणत आहे. पण डबल इंजिनची गरज कमकुवत असणाऱ्यांना लागते. हे डबल इंजिन भरकटलेले आहे. कर्नाटकात बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. कर्नाटकातील निकाल देशाची दिशा बदलणारे असतील असेही चव्हाण म्हणाले.

यावेळ बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, ज्यावेळेला या राज्यातील सरकार कटकारस्थान करुन पाडले त्यावेळी सर्वात आधी सोनियाजी गांधी यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला. ज्यांच्याबरोबर शिवसेननेने २५ वर्ष युती केली त्या पक्षाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, हा भाजपाच इतिहास आहे. आम्ही आपल्या बरोबर आहोत व सत्ताधारी पक्षाचा पराभव करु. पंतप्रधान मोदींनी सुद्धा मंबई महापालिकेच्या ठेवीचा उल्लेख करून त्यांचा उद्देश काय आहे हे दाखवून दिले. मविआ कमजोर करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण त्यात त्यांना यश येणार नाही.

यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुनिल केदार, नसीम खान, जितेंद्र आव्हाड, माजी केंद्रीय मंत्री नसीम खान यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुंबईकर नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.