‘वर्षा’वर कधीच प्रवेश नव्हता, तासन् तास ताटकळत राहायचो; आमदार शिरसाट यांचा आरोप 

मुंबई  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने (Shivsena) त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. यानंतर आता आमदार उघडपणे आपलं मत मांडू लागले आहेत. शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी तर आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत.

ते म्हणाले, काल वर्षा बंगल्याची (Varsha bungalow)दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर ( floor in the ministry) मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो .
तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ? ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटता येत नव्हतं त्यावेळी मतदार संघाची आमच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी एकनाथ शिंदे नेहमी तत्पर असायचे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे