येत्या दोन दिवसात शिंदे-ठाकरे चर्चा करणार; दीपाली सय्यद यांचं ट्विट चर्चेत

मुंबई – राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे.

येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र येणार असल्याचं ट्वीट सय्यद यांनी केलं आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र यावे याकरीता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्ती केल्याचे दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हणले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपा नेत्यांचेही आभार मानले आहे.

सय्यद यांचे आणखी एक सूचक ट्वीट

दिपाली सय्यद यांनी आणखी एक ट्वीट करत मोठा संकेत दिला आहे. ‘लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील’.