आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफझल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही – ठाकरे

मुंबई : आई भवानीच्या आशीर्वादाने विजय आपलाच होईल असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी हे उद्गार काढले. मुंबईतील मातोश्री या आपल्या निवासस्थानी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याच विजयाचा विश्वास व्यत्त केला.

ते म्हणाले, आताचं जे वातावरण आहे ते भारावून टाकणारं आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कितीही अफझल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. माझा आई भवानी आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. आई भवानीचा आशीर्वाद आपल्यावर आहेच, शिवाय कोण खरं कोण खोटं हे देखील दाखवून दिलं आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सध्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले. मला रोज अनेक फोन येत आहेत, कुठेही काही आपलं नुकसान झालेलं नाही. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.