‘ठाणे रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी, घटनेच्या मुळापर्यंत जाणार; दोषींवर कारवाई करणार’

Thane – ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत.

यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. मी सातत्याने या घटनेची माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण या अंतर्गत ते हॉस्पिटल येतं. तरी सुद्धा इतके रुग्ण दगावणं ही धक्कादायक बाब आहे. कशामुळे ही घटना घडली याचा अहवाल एक दोन दिवसात येईल, असं तानाजी सावंत म्हणालेत.

आयसीयूमध्ये 13 मृत्यू झाले आहेत. तर इतर ४ हे जनरल वार्ड मधील आहेत. ही घटना नेमकी कशामुळे झाली? डीनचं दुर्लक्ष झालं का? हे पाहावं लागेल. पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अहवाल येताच कठोर कारवाई कारवाई होईल, असं आश्वासनही सावंत यांनी दिलं आहे.

ठाण्यातील रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. याचा मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. चौकशी समिती तयार करण्यात आली असून चौकशी अहवाल मागवला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे दोघे ही लक्ष ठेऊन आहेत, असंही ते म्हणालेत.