उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सिंहगड रस्त्यावर होतेय वाहतूक कोंडी;  नागरिकांची होतेय गैरसोय

निखील सोनवणे / पुणे – शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील ( सिंहगड रस्ता )  वाहतूक कोंडी ( Traffic Jam) कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर दरम्यान उड्डाणपुलाचे (Flyover Bridge) काम सुरू झाले आहे.यासाठी महापालिकेने १३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे .या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हा पूल निर्माणाधिन(Under construction) असून पुलाची लांबी अडीच कि.मी. असणार आहे. त्यानुसार, दोन टप्प्यांत हा पूल उभारण्यात येणार आहे.

या पुलाबाबत सुरुवातीपासूनच मतमतांतरे होती या मार्गावर पुढे खडकवासल्यापर्यंत मेट्रो (Khadakwasla metro)  प्रस्तावित आहे त्यामुळे भूमीपूजनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीही हा पूल दुमजली करावा अशी सूचना केली होती. उड्डाणपुल आणि मेट्रोचे खांब एकच करावेत असा प्रस्ताव भाजप (BJP) नगरसेविका मानसी देशपांडे आणि सुनीता गलांडे यांनी स्थायी समितीला दिला होता त्यानुसार या पुलाचा आराखडा बदलण्यात आला आहे.

दरम्यान, पुलाचे काम सुरू झाल्यानंतर आता सिंहगड रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रंचड मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.माणिकबाग ते आनंदनगरपर्यंत असणारा रस्ता हा पुलाच्या कामामुळे अरुंद झाला आहे यामुळे आता सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळेला प्रचंड मोठी वाहतूककोंडी होत आहे याचा नागरिक, अबाल-वृद्धांना तसेच रुग्णांना त्रास होत आहे. याची खबरदारी म्हणून काम सुरू करण्याआधीच वाहतूक व्यवस्थेत योग्य ते बदल करून पर्यायी मार्ग बनवून त्याबद्दल जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र,तसे करण्यात महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरलेले दिसत आहेत.