संभाजी ब्रिगेडशी युती करुन उद्धव ठाकरे यांच्या हाताला काहीच लागणार नाही ?

Mumbai – संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, देशामध्ये प्रादेशिक पक्ष, अस्मिता संपवून टाकण्याचे कारस्थान सुरू आहे. यालाच लोकशाही मानणारे लोक बेताल बोलत आहेत.न्यायालयात होणाऱ्या निर्णयावर केवळ शिवसेनेचेच भविष्य नाही तर देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, हे देखील ठरेल. आपण एकत्र येऊन नवा इतिहास घडवूया.

मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. दुहीची बीजे खडकावर जरी फेकली तरी त्याची पाळमुळं खोलवर रुजून तमाम दौलत खाक करून टाकते. आपण या दुहीच्या शापाला गाडून टाकू. ही वैचारिक युती आहे. मतभिन्नता किती आहे यापेक्षा मत ऐक्य किती आहे, यावर काम व्हावयास हवे. सर्वांना मानवेल भावेल अशी भूमिका घ्यायला हवी. त्याकरिता समन्वय समिती देखील नेमण्यात येणार आहे. देशाला मार्गदर्शक ठरेल असा महाराष्ट्र घडवू.असं ते म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर वाईट काळ आला आहे. आता तरी त्यांना आत्मपरीक्षण करावे असा टोला ही त्यांनी लगावला. तर 2019 च्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांनी 40 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना या निवडणुकीत 0.06 टक्के मिळाली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायला राज्यातील कोणताही महत्वाचा आणि मोठा पक्ष तयार नाही. गेल्या अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात राज्याची दुर्गती झाली. राज्याचा विकास खुंटला. त्यामुळे त्यांना आता 0.06 टक्के मत घेणाऱ्या पक्षासोबत युती करावी लागत असल्याचा चिमटा ही त्यांनी काढला. संभाजी ब्रिगेडशी युती करुन ठाकरे यांच्या हाताला काहीच लागणार नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शेवटची घरघर लागल्याचा टोला ही त्यांनी लगावला.