उद्धव ठाकरेचे रोज अध:पतन! चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल बोलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांची उरलेली उंची कमी करीत आहेत. त्यांचे रोज अध:पतन होत आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेत आदर आहे, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे जेवढी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर करतीत तेवढी त्यांची उंची वाढत जाईल, असे सांगून श्री बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी इतिहासात नोंद होईल असा महाराष्ट्राचा सक्षम मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी नवी उंची गाठली आहे. उद्धव ठाकरे यांनाही ती संधी मिळाली होती. परंतु ते त्यांची बरोबरी करू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भावासारखी सांभाळले, याचा मी साक्षीदार आहे. सरकार व पद गेल्यामुळे त्याचे लोक त्यांना सोडून जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बावचळेल्या व उद्ववस्थ मन:स्थितीत आलेले आहेत. महाराष्ट्रात शांतता राहावा असे आम्हाला वाटते. परंतु यासाठी आम्ही जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर त्याचे पडसाद उमटतील, भाजपालाही रस्त्यावर उतरावे लागेल.

निवडणूक आयोग घेणार योग्य निर्णय
ज्या पक्षाचे खासदार, आमदार जास्त, पक्ष त्याचाच असा नियम आहे. निवडणूक आयोग नियमानुसारच काम करेल. ज्याकडे आमदार, खासदार जास्त पक्ष त्याचाच असतो. अजित पवार गटाकडे आमदार जास्त असतील. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही पुरावे असतील. त्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असेल. मात्र, योग्य तो निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही ते म्हणाले.

अजितदादा करणार मतपरिवर्तन!
शरद पवार काहीही बोलले असतील त्यांच्या ज्या आजच्या भावना आहेत, पण पवार कुटुंब आतापर्यंत एकत्र राहलेलं आहे. त्यामुळे आज ना उद्या त्यांचे मनपरिवर्तन नक्की होईल, अजित पवारांच्या भूमिकेला शरद पवार टाळू शकणार नाहीत. अजित पवार यांच्या भूमिकेसोबत शरद पवार येतील असा विश्वास आहे”, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.