कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही – मंगल प्रभात लोढा

मुंबई – महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्देवी असून आम्ही त्यांच्या निषेध करतो. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर हिंसक घटना वाढत असून मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी दिला.

मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथील हिंसक घटनांच्या निषेधार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सीएसटी रेल्वे स्टेशन येथील अमर जवान ज्योत या स्थळी धरणे आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत लोढा म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानतंर दंगलखोरांचा एक खास वर्ग सक्रिय होत हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. यासर्व हिंसक घटनामुळे राज्यातील हिंदू कुटुंबे आणि संस्थांचे नुकसान होत आहे. तसेच अफवांचा आधार घेऊन उघडपणे गुंडगिरी करत पोलिसांवर देखील लाठ्या-काठ्या, दगडफेक केली जात आहे. असला हिंसाचार मुंबईत होऊ देणार नाही असा इशारा मंगल जी यांनी दिला.

यावेळी मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते व आमदार प्रविण दरेकर, आमदार राहुल नार्वेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.